Popular Posts

Tuesday, December 27, 2016

कर्नाटक राज्योत्सव,

कर्नाटक राज्योत्सव,

ह्या दिवसात जर कधी बंगलोर ला येणं झालं तर कोणाच्याही एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे जागोजागी होणाऱ्या एका विलक्षण अशा आयोजनाचं, कर्नाटक राज्योत्सव. मी कोणता एक दिवस म्हणत नाही पण नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये कधीही. विशेषतः शनिवार-रविवार. खरं तर 1 नोव्हेंबर हा कर्नाटक दिन किंवा राज्योत्सव म्हणून साजरा होतो. ह्या दिवशी दक्षिण भारतातील कन्नड भाषिक भूभागांना एकत्र आणून एका राज्याची निर्मिती करण्यात आली. ह्याविषयी इतर सर्व माहिती विकिपीडिया, नेट वर मिळेलच पण तो कसा केला जातो ह्याचं जास्त काही माहिती मिळणार नाही. पण तुम्ही कर्नाटकात कधी फिरत असाल तर मात्र ते कळेल. हि दिवस 1 नोव्हेंबर ला तर अधिकारीक रित्या सरकारी कार्यालयात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी साजरा होतोच पण विशेष बाब हि कि हा दिवस पुढील दोन महिने कधीही साजरा केला जातो. सरकारी कार्यालयात मला कल्पना नाही पण पुढची काही दिवस राज्योत्सव हा खाजगी कंपन्यांमधे(त्यात आमच्या IT कंपन्या पण आल्या), रिक्षा स्थानकांवर, बऱ्याचदा अशाच चौकात साजरा केला जातो. ह्यात सगळ्यात दिसून येणारं म्हणजे रिक्षा वाले आणि चौकातील राज्योत्सव. रिक्षावाले आपल्या एरिया मधील सगळ्या रिक्षांना सजवतात, लाल-पिवळा असा कर्नाटक चा झेंडा लावतात, आजू बाजूचे रस्ते ह्या झेंड्यांच्या फरफर्यानी सजवले जातात. पूजा होते, कर्नाटक गीत लावलं जातं. विशेष म्हणजे ह्या वेळी शाखेत मला कर्नाटक गीत शिकण्याचा चान्स मिळाला. 'जय भारत जननिय तनुजाते, जय हे कर्नाटक माते' - अतिशय सुंदर काव्यरचना आणि भावुक अर्थ असलेलं हे गीत गाताना 'महाराष्ट्र देशा' हे गीत गायल्याची अनुभूती येते. फारच सुरेख! रिक्षावाले मग प्रभात फेरी काढतात.
आणखी एक अनोखं राज्योत्सव पाहायला मिळालं ते म्हणजे चौकटल किंवा मुख्य रस्त्याच्या कडंच. एक छोटंसं व्यासपीठ सजवलं जात ज्याचं बॅकग्राऊंड एका पोस्टर ने व्यापलेले आहे. ह्या पोस्टर वर कर्नाटक मधील ऐतिहासिक लोकांचे चित्रे असतात. हे मला वाटतं एक खाजगी आयोजन असतं. फक्त एखाद दोन लोक असतात त्यात. ह्यातीलच कोणतरी गाणे गात असतो, साहजिकच कर्नाटक च्या अभिमानाला धरून असलेली गाणी. लोक जमतात, गाणी ऐकतात, टाळ्यांनी दाद देतात. हे सहसा सायंकाळी होतं. जेंव्हा लोकांना वेळ असतो. हे कधी आपल्याकडे होताना पाहिलं नाही.

मूळ मुद्दा हा कि हे राज्योत्सव पुढील दोन महिने कधीही साजरा केला जातो. अगदी आजही होतोय जे बघून मला हे लिहावंसं वाटलं. माहित नाही अजून किती दिवस होईल. पण ह्याचं कारण मला अजून जाणून घेता आलेलं नाही की हे एकदम ना होता दोन महिने का चालू असतं. पण नक्कीच काहीतरी योजना आहे ह्यामागे. जसं कि प्रत्येक जण आपल्या सवडीप्रमाणे साजरा करू शकतो. आणखी एक म्हणजे बरेच दिवस साजरा होत असल्याने त्याचा आणि त्याच्या मागच्या इतिहासाचा विसर पडणार नाही. एखाद्याचा कधी चुकला तर परत कुठंतरी तो नक्कीच हजरी लावू शकतो. पण एकंदरीत बघता हे सर्व लै भारी वाटतं. ज्या भक्ती भावाने ते साजरं करतात(साऊंड सिस्टम चा अपवाद वगळता जे आता सगळीकडं आहे) ते अगदी वाखाणण्याजोग आहे. मी कधी पुण्य मुंबई मध्ये राहिलो नाही आणि 1 मे ला तर कधीच नाही. त्यामुळे तिथे महाराष्ट्र दिन कसा साजरा होतो आणि कोठे होतो हे काही माहित नाही. त्यात भर कामगार दिनाची जी हक्काची सुट्टी. मग कधी ऐकिवात नाही की नेमकं काय केलं जातं. गावाकडं पण काय विशेष हवा नसते. माहिती असल्यास नक्कीच शेयर करा. डिटेल दिले तर आणखीनच आनंद!

कन्याकुमारी ला जातोय आणि उद्या विवेकानंदांचं स्मारक पाहण्याची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा पूर्ण होईल. हा लेख आज सुचला आणि उद्या विवेकानंद स्मारकाला भेट हा एक अतिशय गोड योगायोग! देशाला जोडायला आज विवेकानंद हवेत.

जय महाराष्ट्र, जय कर्नाटक, जय हिंद!

उगाच कोणाला दुखावणार नाही ह्याची आधीच काळजी घेतलेली बरी!

- आलासकर