Popular Posts

Thursday, November 29, 2012

Lyrics of "Omkar Garajto" Song from Marathi Movie 'Taryanche Bet'


"ताऱ्यांचे बेट" ह्या चित्रपटातील "ओमकार गरजतो" ह्या गणेश वंदनेचे बोल!
Google वर कुठे मिळाले नाही म्हणून Blog वर टाकतो आहे!
हे गीत आणखी मोहक वाटते जेंव्हा ते आपण सुरेश वाडकर ह्यांच्या स्वरात ऐकतो! अप्रतिम!

ओमकार गरजतो नाद अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सकल गुणेश्वर तू भवतारक मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
तू प्रज्ञा तू विवेक माझा, मी करता तू कर्म प्रेरणा!
तुझ्या कृपेचा दे माझ आशिष, गौरी नंदन मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ओमकार गरजतो नाद  अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
तुझ्या पदी मी दिन  शरणागत, मी पापी तू पाप विनाशक!
रंग  तुझा दे छंद मला, विघ्नविनाशक मोरया!
ओमकार गरजतो नाद अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ओमकार गरजतो नाद  अनाहत, गौरी नंदन मोरया!
गणपती बाप्पा मोरया!


धन्यवाद!
शापित!

Tuesday, November 27, 2012

आजीस पत्र!

।। श्री ।।


प्रिय आजीस,
शी. सा. नमस्कार.

        ह्या आधी शाळेत असताना बरीच पत्र लिहिली. पण हे पत्र लिहितानाची धड-धड आणि धडपड हे त्या वेळच्या पत्रापेक्ष्या कितीतरी वेगळे, अधिक आहे.

        पत्रास कारण कि तू जाऊन आज २६ नोव्हेंबर ला १५ दिवस झाले. आजच घरून बन्गलोरे ला आलो आणि एकटेपणाचे ढग दाटू लागले. घरी होतो म्हणून नव्हे तर तुझ्या आठवणीचे वारे मनात घोंगावत आहेत. आता तू म्हणशील असा कुठे तूला रोज उठून विचार पूस करायचो! पण म्हणतात ना माणसे लांब गेली कि त्यांची किंमत कळते. पण त्यासाठी ती इतक्या दूर जावी लागतील कि परतीच्या वाटा बंद होतील, ह्याची कल्पना नवती. मी तुझ्याशी फोनवर कधीतरी संवाद करायचो. हेही माझ्यासाठी बोचणी ठरते आहे. असो. तू समोर असतीस तर तुला हे सर्व बोलणे कृत्रिम वाटून तुझा एक हलकाच पण प्रेमळ टोमणा हि मला बसला असता, "जारे भाड्या, जास्त माया नको दाखवू".

        तुझ्याबद्दल लिहिताना कुठून सुरुवात करू हेच लक्ष्यात येत नाही आहे. माझ बालपण जास्ती करून होस्टेल वर गेल आणि तुझी जास्त सोबत भेटली नाही. तुझ्यापेक्षा माझी गट्टी तशी आप्पांशीच जास्त असायची. पण तुझ्या रुसव्या-फुगाव्या चे काही किस्से नक्की आठवतात. तुझ रुसून जाऊन देवळात बसने आणि आक्काच्या हजार मिनत्या करून देखील जेवायला घरी न येन काही नवीन नवते. फार लांब जायला नको. हे तुझ लहान मुला सारखा रुसन-फुगणं अगदी परवा परवा पर्यंत दिसायचा. पण ते सर्व क्षणिक. तुला मनवायला बापुतात्याना नि तात्यांना जास्त वेळ  लागायचा नाही. मला आठवतंय बर्याच वेळा तूला रुसलेला पाहिल आणि मी मूड मध्ये असलो कि तुझे गाल धरून चेष्टा केली कि तुझा राग कुठच्या कुठे गायब होऊन त्याची जागा तुझ प्रेमळ आणि मन भरून टाकणार हसू घ्यायच. खंत एवढीच कि हि कल्पना मला हल्लीच सुचली होती. आणि मन दुखी होत कि मी तुला असा फार वेळा हसवू शकलो नाही. मला आठवतंय काही वेळा रात्री झोपी जाण्या अगोदर मी तुझी अशीच चेष्टा केली होती आणि तू अगदी निश्चल हसली होती. भरपूर वेळ. तुला हसलेल पाहून घरात एकाच हश्या पिकायचा. त्याच काय तुझ्या सोबतच्या माझ्या थोड्या फार आठवणी मनाच्या कोपऱ्यात घर करून बसल्या आहेत. गेली पंधरा दिवस तुझा हसरा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतोय. मग दिवस कसा हि गेला असेल तुझी आठवण येऊन डोळ्यांच्या कडा पाणावल्या शिवाय राहिल्या नाहींत. अगदी आताही.

        तू जशी रागीट होतीस त्याच्या कितीतरी पटीने प्रेमळ होतीस् ह्यास कोणी नाकारू नये. तू गेलीस आणि मी पाहिले असतील नाना जातीची माणसे तुझ्या बद्दल प्रेम व्यक्त करून गेली. मग त्या नन्ही गल्लीतील बायका असोत वा महार वाड्यातील असोत. सर्वांची तू कधी न कधी त्या रस्त्यावर नुसत्या दिसल्या तरी केलेली विचारपूस त्या सर्व बोलून दाखवतात. हे झाले माणसांचे. माझ बालपण आणि तुला जोडनारी एखाधी कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे प्राणी-पक्षी. तुझं सनी आणि डॉली (आपले पाळीव कुत्रे) वरील प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मग ते सनीला हाताने भरवलेला घास असो नाहीतर डॉलीला मारले म्हणून तुझे तात्यांवर रागावणे असो. सर्व काही जसच्या तसं आठवतंय. ह्याला आणखी एक कारण म्हणजे ते दोन्ही माझे खूप प्रिय होते. मग कधी कधी वाटतं माझं प्राण्याबद्दलच प्रेम हे तुझ्यापासून उपजतच आल असेल. किती आठवणी! तुझं त्यांना वेळेवर जेवण दे हे सांगणं (मग ते आधीच दिलेलं असेल तरी). त्यांना बांधून घालू न देणं. उठ सुठ त्यांची साखळी सोडून देनं. ह्यातच तुझा आनंद असावा बहुदा आणि साहजिकच माझाही. राकेश कडे तुझ्या जेवढ्या आठवणी आहेत त्या कोणाकडे क्वचितच असाव्यात. साहजिकच आहे. तो कधीच घर सोडून गेला नाही आणि शेवट पर्यत तुझा सहवास त्याला लाभला. मग ह्याच कारणाने का होईना मला कधी कधी त्याचा हेवा वाटतो. नशीबवान तो! त्याने मला सांगितले तू देवळातील आलेलं धान्य (तांदूळ, ज्वारी वगेरे) मुठ-मुठ भरून चिमण्यांना अंगणात घालायचीस. आणि मी कल्पना करू शकतो  त्यांना ते तांदूळ खाताना बघून तुझ्या चेहऱ्यावरील तो आनंद. तुला प्राण्यांचा आणि कुत्र्यांचा किती लळा होता ह्याचे अनेक किस्से तू मला माझ्या बालपणी ऐकवले अशील. मग तो गजुतात्यानी शेतातून आणलेला मुंगुस (ज्याला तू विठ्या म्हणायचीस) असो किंवा आपल्या घरातील एका फोटोतील तुझा प्रिय कुत्रा असो. आणि त्यांचाही तुझ्यावरील किती प्रेम असेल ह्याची कल्पना मी करू शकतो. कोण कुठल ते धनगराच पुरातून वाट चुकून आलेल कुत्र, आजही घर सोडून जात नाही. आणि जेंव्हा ते दारात येऊन भाकरीची वाट बघत तेंव्हा वाटतं ते तुझीच वाट बघतय कि काय. तूच कारण अशील ज्याने ते अबोल जीव गल्ली सोडून अजून गेलं नाही. त्याला कल्पनाहि नसावी तू त्याला आता कधीच दिसणार नाहीस ते.

        तुझ्याबद्दल बोलत असेन आणि तुझ्या मैत्रिणींची बात निघू नये हे होऊच शकत नाही. तुझ्या अनेक मैत्रिणीना मी जवळून पाहिलय. वाडीकरांची सखू आजी, कोळ्यांची लक्साजी, समोरची वचिला आजी, मुसलमानाची गुलशन आजी. ह्यांच्यासोबतच्या तुझ्या आठवणीचा विषय निघाला तर वेळच कमी पडावा. सखू आजीचा नातू परवाच सांगत होता, तुझ्या जाण्याने जणू तिझ्यावर दुखाचा आभाळ कोसळलं. ती  म्हणे रात्री १० वाजेपर्यन्र्त ओक्साबोक्शी रडत बसली होती. आणि गेल्या १५ दिवसात दर एका दिवस आड ती आपल्या घरी येते आणि आणि मन हलक होऊपर्यंत बोलत बसते. तिझ मन मोकळे पनाने ऐकून घेणारा जणू देवच हरवला आहे. तुझ्या आणि तिच्या आपल्या घरातील भेटीचे किस्से आजही बोलले जातात आणि त्यातून तुझ्या  आणि सखू आजी मधला जिव्हाळा कळून येतो. तिचा घरी अल्यावर तुझा चहासाठी आग्रह करण. आणि मग तुमच्या तासंतास चालणाऱ्या  गप्पा. काय ते तुम्हा दोघीनाच माहित. तेच लक्सा आजीच देखील. तिचे अडखळत चालणारे पाय आजही नकळत आपल्या घराकडे वळतात आणि आणि तू घरात नाहीस ह्या  जानिवाने तिझे डोळे ओले करून जातात. आठवतं मला वचिला आजीचं पहिलीतील मुला प्रमाणे तुला पेपर मधील बातम्या वाचून दाखवणं. आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण देनं. ती आली होती आत्याचं आणि आमच सांत्वन करायला. आणि तिझ् एक वाक्य मनात काहुरच माजवून गेलं. ती  वडिलांना म्हणाली, "काय सांगू रे पका, तुमच्या आयुष्यात 'आई' शब्दच नाश पावला की रे." ते ऐकून मन अगदी सुन्न झाले. आणि  तात्या सोबत माझ्याही मनाचा बांध सुटला. गुलशन आजीला बहुदा तुझ्या जाण्याची खबर नसावी नाहीतर ती तीर्डीवरून हि उठून आली असती तुला शेवटचा पहायला. लहान पणी अनेक वेळा ती घरी आल्यावर तू आम्हा पोरांना बोलावून घेऊन तिला नमस्कार करायला लावायाचीस. आणि मग प्रत्तेकाकडे एकेक न्हाणे देऊन तू आम्हाला घरातील मधल्या भिंतीवर ते देवांचे नाम स्मरण करून चीकटवायला लावायाचीस. चिकटला तर देवाने ऐकले असे गुलशन आजी सांगायची,  नाही तर आहेच आणखी एक प्रयत्न. न्हानं चिकटलेल पाहून तुला नक्कीच प्रसन्न वाटत असणार.

        मी अनेक वेळा सुट्टीत गावी आलो कि चिंच, पेरू, जांभूळ आणायला जायचो. आठवणीने तुझ्यासाठी एक गोड इलायची चिंच, एखादा पिकलेला पेरू किंवा मऊ  जांभूळ न विसरता  आणायचो. आणि तेही तू अगदी आवडीने खायचीस. जुन्या ब्रह्मनाथाच्या देवळा मागचे पेरूचं झाड आजही आठवते. पिकलेला पेरू पाहिला कि तुझी व त्या झाडाची आठवण आल्या बगेर राहणार नाही. नक्कीच! तुला लहानपणी बर्याच वेळा चिरमुरे बारीक वाटून दिल्याचे आठवते. ते तुला खायला सोपे जावे म्हणून. तुझ्या हातावरच्या भाकऱ्यांची मला भारीच आवड होती! त्या भाकऱ्या आता परत नशिबी नाहीत! तात्या आणि गजुतात्या तुझ्या भाकर्याबद्दल भरभरून सांगतात. एक खाल्ली कि दुसरी मागायची गरजच भासू नये! तू त्यांच्या मास्तरांना करून घातलेल्या जेवणा बद्दल च्या आठवणी ते सांगायला विसरत नाहीत! आणि ते मास्तर हि विसरनार नाहीत!
       
        देऊळ आणि दुकान ह्यापलीकडे तुझ जाणं नव्हतच. पण गावातील हरेक खबर तुझ्या कानावर यायची ह्याचा मला अजून हि नवल वाटतंय. प्लॉट मध्ये काय लावलय आणि कश्याची झाडे आहेत आणि ती किती वाढली आहेत हे तुला अचूक माहित असायच. तेही तिथ न जाता हे सांगायला नकोच. गंगू ताई ने तिच्या शेतात काय माळवे लावले आहे ह्याची खबर तुला असायची आणि तिने पहिले फळ तुलाच नैवेद्य म्हणून द्यावे हा तुझा प्रेमळ व तितकाच हक्काचा  आग्रह असायचा. नाही दिले तर तिची खैर नसे. देवळात आजही मुले दंगा करू लागली कि तुझी आठवण आल्यशिवाय राहत नाही. मग लोक सांगतात तुझा खणखणीत आवाज त्या पोराना बाहेर पडायला लावायचा. असे अनेक वेळा तू मला रागावल्याच मला आतादेखील स्पष्ट आठवतंय. आणि तुझा रागावणं हे सरळ भाषेत असेल तर मग त्यात नवल कसलं! मी गावभर हुदडून अगदी घराच्या मागे लघुशंका केली तर तू बोलायचीस, "गाव फिरुन्न येतंय आणि घरात मुत्तय"! तसेच घरचे  एखादे काम करण्यास नकार ऐकला कि तुझा आवाज घुमत असे, "खादिला खार आणि भूमीला भार"! अश्या अनेक म्हणी मधून तू आम्हाला आयुष्याचे बरेच धडे दिलेस. काटकसर मी जरी तात्यांकडून शिकलो असलो तरी त्याचे मुळ तूच होतीस. दुसर्यावर जास्त अवलंबून न राहणे हे तू आयुष्यभर पाळलेस.

        तू तुझ्या आयुष्यातील अनेक कठीक प्रसंगाचे वर्णन करताना तू अगदी डोळ्यासमोर उभी राहायचीस. मग मन उगीच त्या तुझ्या तरुण वयातील काळात भरारी मारायचे आणि तुला व तुझ्या सहा मुलांना सांभाळ करताना तुझी होणारी ससेहोलपट याचे चित्र समोर उभे राहायचे. मग शंकर काकांचा विषय निघाला कि तुझे डोळे भरून यायचे आणि तुझ्या त्या जाड भिंगाच्या चाळशीच्या (ती तुझी चाळशी मी माझ्यासोबत घेऊन आलो आहे, तुझी आठवण म्हणून) मागे डोळ्यांच्या कडा पुसायला तुझा पदर हळुवार जायचा. शंकर काकाला झालेला आजार आणि त्या वेळी अप्पांचे बाहेर गावी जाणे आणि त्यातच त्यांचे निधन हे सर्व सांगताना तुझा धीरगंभीर झालेला आवाज आठवतोय. तुझ्या पायांची दुर्दशा कशी झाली हे मग तू आम्हा मुलाना कैक वेळा सांगितले असशील. ह्या सर्व गोष्टी ऐकल्यावर माझेही मन भरून यायचे. मग वाटायचे मी किती सोपे जगणे जगतोय आणि स्वताचीच कीव यायची.

        तुला दवाखान्यात भेटायला आलो. ती आपली शेवटची भेट असेल याची तिळमात्रही  कल्पना मला नवती. तू तुझे पोटाचे दुखणे बोलून दाखवलस.  तुला तो प्राणवायू चा मास्क त्रास करत होता आणि तू मी तो काढावा म्हणून सांगत होतीस. तुला त्या स्थितीत बघून अंगात कापरे भरले. एका मनाला वाटले तुला ह्याची गरज नाही व तू आता लगेच उठून जेवण करशील. मग दुसरं मन त्या आजू बाजूच्या मशीन बघून घाबरून गेलं. तुझा घसा कोरडा पडला होता आणि तुला पाणी हवे होते. ते सिस्टर ने  तुला पाजले. तुझे तोन्ड पुसायाचीही माझी हिम्मत होत नवती. न जाणो काहीतरी चूक केली तर?? तेही मी प्रज्ञाला सांगितले. मी एक क्षुद्र असल्याचा भाव झाला!  एवढा शिकून देखिल मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. मी तुला विचारले कि "कोण आले आहे सांग बघू?" तु तिला ओळखलेस. तेच तुझे शेवटचे बोल माझ्या कानात अजून हि घुमत आहेत, "मला माहित आहे रे, तुझी बायको आली आहे ते." तू बरी होशील याच भोळ्या आशेने आम्ही रात्री घरी निघून गेलो. पण ते होणे नवते. सकाळी फोन आला आणि मन सुन्न झाले. तू गेली होतीस. अगदी कायमची! गाडीतून तुला मी घरी घेऊन जाताना ठरवले होते रडायचे नाही! पण तुला शेवटचा दंडवत घालताना आणि अग्नी द्यायच्या आधी पाणी देताना मनाचा बांध फुटला. एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुझे दोन्ही गाल हाताने हळुवार दाबले! पण तू हसली नाहीस आणि मला रडू आवरले नाही!

        तुला अनेकदा मी भले बुरे बोललो असेन. त्याची माफी मागावी एवढी माझी पत नाही. शक्य असेल तर माफ कर. सगळे तुझी फार आठवण काढतात ह्यात शंकाच नाही! तुला चिरशांती लाभो आणि तुझे आशीर्वाद सतत सोबत असो हीच प्रार्थना.

        आजी, धन्य आहेस तू आणि धन्य तुझा जन्म! तूझ्या सोबतच्या अशा अनेक आठवणी आणि तू दिलेल्या शिकवणी आम्हाला कायम उमेद देत राहतील! तू जरी नसलीस तरी तुझ्या ह्याच आठवणीत तू अजून जिवंत आहेस आणि राहशील!

म्हणतात गेलेली मानसं परत येतात! येशील का तू माझ्याच पोटी?? तुझ्या उपकाराचे पांग फेडायची एक संधी घेऊन!

तुझा प्रिय(!) नातू,
बंडू.